Nagar Political News : शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवाराला कुठल्याही पक्षांनी लोकसभेची उमेदवारी दिली नाही. शिर्डी लोकसभा आरक्षणाची ही शेवटची पंचवार्षिक निवडणूक असून किमान आता तरी संख्येने सर्वात जास्त असलेल्या बौद्ध समाजाला संधी मिळावी ही समाजाची भावना आहे. अन्यथा त्याचा परिणाम शिर्डीसह नगर दक्षिण लोकसभेवर सुद्धा होणार असून मतदानावर बौद्ध समाज दोन्ही मतदार संघात बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणार असल्याचे समाजाच्या वतीने झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला आहे.
रिपाईच्या कवाडे गटाचे सुमेध गायकवाड, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहित आव्हाड, काँग्रेसचे सुनील शेत्रे, आरपीआय आठवले गटाचे किरण दाभाडे, भीमशक्ती संजय जगताप, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे योगेश थोरात , रिपब्लिकन सेना मेहेर कांबळे ,अविनाश भोसले, विवेक भिंगारदिवे, पोपट जाधव, समीर भिंगारदिवे, नितीन कसबेकर उपस्थित होते.
सुमेध गायकवाड म्हणाले, “शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये या अगोदर फक्त समाज सोडून इतरांना उमेदवारी दिलेली आहे. एक प्रकारे समाजावर अन्याय केलेला आहे. रामदास आठवले याना एकदा उमेदवारी दिली पण त्यांना याच मतदारसंघांमध्ये पाडण्यात आले असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. राज्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघ हे राखीव आहे. या राखीव जागेवर कोणीही बौद्ध समाजाच्या लोकांना उमेदवारी देत नाही म्हणून आता आम्ही या पाचही मतदारसंघांमध्ये निर्णयाक भूमिका घेणार आहे”. राज्यातील महाविकास आघाडी अथवा महायुती, असो यांनी उमेदवारी देताना आता बौद्ध समाजाच्या माणसाला उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला.शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये आमचे अडीच लाख मतदान आहे. तर अशा प्रकारे आमच्याकडे नगर मतदार संघामध्ये तेवढेच मतदार आहे. त्याचाही विचार इतरांनी करावा व आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू किंवा नोटा बटनाचा वापर करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे यांनी बौद्ध समाज हा कधीच कोणावर अन्याय करत नाही आम्ही सर्वांना बरोबर घेऊन काम करत असतो. कुठल्याही इतर समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात सर्वप्रथम बौद्ध समाज रस्त्यावर उतरतो. या निवडणुकीमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे सांगितले. तसेच उमेदवारी देताना बौद्ध समाजाच्या उमेदवाराचा विचार व्हावा आम्ही कुठल्याही पक्षात जरी असलो, तरी मात्र आम्ही आता समाजासाठी एकत्र आलो आहोत. या अगोदर सुद्धा या समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्हाला उमेदवारी पाहिजे आहे. कोणालाही उमेदवारी द्या. मात्र बौद्ध समाजाला उमेदवारी दिली गेली पाहिजे, अशी आमची भावना आहे. अजूनही उमेदवारी कोणाची निश्चित झालेली नाही. त्यामुळे आता राज्यातील जे मोठे पक्ष आहेत, त्यांनी आता याचा विचार करावा, अन्यथा या निवडणुकीवर बहिष्कार टाकू. याचा परिणाम नगर दक्षिणेवर सुद्धा दिसून येईल, असेही सुरेश बनसोडे यांनी म्हटले.