तब्बल एक ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. दुष्काळाचे नैसर्गिक संकट टळण्यासाठी आणि चांगला पाऊस पडावा, म्हणून अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्यावतीने उद्या (रविवारी, ता. 3) नमाज इस्तिस्काचे आयोजन करण्यात आले आहे. मौलाना नदीम अख्तर यांनी ही माहिती दिली.
ईदगाह मैदान इथं सकाळी 10:30 वाजता पावसासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यासाठी या विशेष नमाज होणार आहे. या नमाजसाठी समस्त मुस्लिम बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे पिके करपू लागली आहे. तसेच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. एकंदरीत राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे.
दुष्काळाचे संकट गडद हाेत चालल्याने हे दूर व्हावे आणि पाऊस पडावा म्हणून मुस्लिम समाज बांधव नमाज पठण करणार आहे. या नमाज पठणामध्ये संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी आणि दुष्काळी परिस्थितीच्या संकटातून सर्वांना सावरण्यासाठी अल्लाहकडे पाऊस पडण्यासाठी सामूहिक दुवा करणार आहे.