आम्ही चार भाऊ व एक बहीण. ती सर्वात लहान. कोरोनामध्ये आई आमची अचानक निघून गेली. कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला. या मधून सावरणे अवघड होते. परंतु या कठीण काळात ही आमचे सर्व कुटुंब कसेबसे सावरले. ताई सर्वात लहान असूनही तिने आम्हाला सावरण्यात सिंहाचा वाटा उचलला. खरे पाहता सर्वात मोठे दुःख तिला झाले, हे नंतर आम्हाला कळले. तिने त्याची किंचितशी जाणीव होऊन दिली नाही. कारण रोज दुपारी आई तिला फोन करत होती. ती कित्येक वर्षांपासून सर्व कौटुंबिक सुख दुःखाच्या गोष्टी तिच्या बरोबर वाटून घेत होती. त्यामुळे ताई पुण्यात असून तिला सर्वकाही कळत होते आणि आमच्या भावात काही त्रुटी असल्यास ती नकळत आम्हाला लहान असूनही समजावून सांगत असे.
आई गेल्या नंतर दोन वर्षेही नाही झाले, वडील आजारी पडले. त्यांना अहमदनगर येथून पुण्यात रुबी हॉस्पिटलनंतर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. हा क्षण आमच्यासाठी संकट हाेते. वडिलांना पुण्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिथे कुठे राहायचे, कुठे खायचे, आर्थिक संकट कसे दूर करायचे, असे अनेक प्रश्न आमच्यासमोर उभे होते. पण ताईने एखाद्या मोठया भावाने धीर द्यावे, तशी उभी राहिली. मी आहे तुमच्याबरोबर, असे म्हणून तिने आम्हा तिघा भावना त्यांचे सर्व कुटुंबाला फार मोठा आश्रय दिला.
आम्ही तिघे भाऊ व आमचे सर्व कुटुंब ताईकडे राहत होतो. एक दोन दिवस नव्हे तर चक्क दोन तीन महिने. या काळात आम्ही 1-2 नव्हे तर लहान-मोठे 12, असे नातेवाईक तिच्या घरी असायचाे. धावपळ असायची. इतक्या लोकांचे नाश्ता-पाणीपासून दुपार-रात्रीच्या जेवण-खाणं सर्वकाही करणे सोपं नव्हतं. पण कधी ताईने हे अवघड आहे, असे दाखवले नाही. विशेष म्हणजे आमचे भावजी संदीप यांनी सुद्धा त्या काळात आपला संपूर्ण व्यवसाय बंद करून आमच्या खांद्याला-खांदा लावून उभे हाेते. सर्वोतोपरी सहकार्य त्यांनी केले. त्यामुळे वडिलांच्या आजारपणाच्या काळात ताई आणि भावजी यांच्याविषयी आदर अगोदर पेक्षा जास्तच वाढला.
एकीकडे वडिलांचा दवाखाना चालू होता. लाखोंचा खर्च हाेत हाेता. वडिलांच्या प्रकृतीत चढउतार हाेत हाेते. या परिस्थितीत ताई तिचा दिवसभराचा जॉब करून वेळ मिळेल तसे दवाखान्यात येऊन घरी कोणतीही गोष्ट कमी पडून देत नव्हती. इतकेच नाही तर अनेक वेळा औषधांना पैसे देऊन ही न दिल्याचे भासवत होती. जर तिला आपण काही विचारले तर फक्त म्हणत, असे मी पण त्यांची मुलगी आहे. माझी पण जबाबदारी आहे. अडचणीच्या काळात मदतीपेक्षा स्वार्थी बुद्धीने वावरणारे हे जग, तिच्या या स्वभावापुढे किरकाेळ वाटू लागले. शेवटी तर तिने आपले सोने विकून औषधोपचाराचे नियोजन करण्याची तयारी दर्शवली. ही गोष्ट आम्हाला दुसरीकडून कळल्यानंतर मन भरून आले. या बाबत तिला विचारणा केली, तर तिचे एकच उत्तर… “माझी पण जबाबदारी आहे दादा, तुम्ही किती खर्च करणार, मलाही करू द्या”. त्या वेळेस आम्ही तिला सांगायचो, ‘आम्ही थकलो की सांगू’.
या वेळेस माझा लहान भाऊ अमेरिकेतून एक-दोन नाही, तर तीन वेळेस वडिलांच्या काळजी पोटी आला. नुसते आलाच नाही तर त्याने सुद्धा वडिलांच्या औषधोपाचाराची सर्व जबाबदारी उचलली. त्याचा सुद्धा फार हेवा वाटला. नाही तर आपण पाहतो परदेशात गेलेली व्यक्ती आपली सर्व जबाबदारी विसरून स्वार्थी वृत्तीने वावरते. तशी अनेक उदाहरणं आजही आजूबाजूला आहेत. पण त्याने कोणत्याही खर्चाची परवा न करता अभेद्य उभा राहून सर्व गोष्टीत्त सिंहाचा वाटा उचलला. खरंच लहान असूनही मोठयाला लाजवल, असे काम त्याने केले.
शेवटी नकाे, तेच घडलं. मृत्यू सत्य आहे, हे स्वीकारावं लागले. वडील गेले. आम्ही भाऊ-बहीण पोरके झालो. परंतु आई वडिलांच्या इच्छेनुसार आजही आम्ही चौघे भाऊ बहीण एकदिलाने राहतो. बहीण- ताई आजही आमची इतकी काळजी घेते, की आम्हाला आई वडिलांची जाणीव होऊ न देता तिचे कुटुंब सांभाळून आमच्या कुटुंबाचीही काळजी घेते. म्हणून म्हणतात, “बहीण एक अनोखं नातं”!
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण. असं म्हणतात की, “देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ, असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली”. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं..!
-श्रीनिवास बोज्जा, अहमदनगर
मो.9890812000