Ahmednagar News ः नगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितेसाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 37 (1), (3) तरतुदींनुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. नगर जिल्ह्यात हा आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेता येणार नाही. तसेच दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवता येणार नाही.
तसेच सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास, मिरवणुका काढण्यास आणि पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई केली आहे.
दरम्यान, सरकारी सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे. प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्न समारंभ, लग्नाच्या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्यास अथवा मिरवणूका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.