Change in teacher set approval ः शालेय स्तरावर शिक्षक नेमणुकी करीता प्रत्येक वर्षी शाळांची संच मान्यता करून पदे निश्चित केली जातात. 2014 पासून मात्र निकषात बदल होऊन तुकडीवर आधारीत शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी संच मान्यता होऊ लागल्या. 2015 पासून शारीरिक शिक्षकांचा विशेष शिक्षकाचा दर्जा काढून 6 ते 8 या उच्च प्राथमिकला वर्गीकृत करण्यात आल्याने कार्यभार बसत नसल्याने पद भरतीत शारीरिक शिक्षक डावलला जाऊ लागला. त्यामुळे 2019 च्या शिक्षक भरतीत 0.01 टक्केच शारीरिक शिक्षकांची पर भरती होऊ शकली. चालू भरतीत देखील 36 जागांच्या आसपास उच्च माध्यमिकपर्यंतच्या अतिशय नगण्य जागेची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. मात्र सरकारने नुकत्याच निर्गमित केलेल्या निर्णयात संच मान्यतेच्या निकषात सकारात्मक बदल केल्याने पुढील भरतीपासून शारीरिक शिक्षकांची पदे वाढली जाणार असल्याने पदवीधारकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संचमान्यतेचे बदललेले निकष, शाळांचे बदललेले स्तर व स्तरानुसार होणारी संचमान्यता यामुळे माध्यमिक 9 वी 10 वी स्तरावर शारीरिक शिक्षकाचा कार्यभार बसू शकत नसल्याने पदभरती अल्प प्रमाणात होत होती. सर्व संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून शासनाने सकारात्मक बदल केल्याने शारीरिक शिक्षक व्यवस्थेत पुन्हा घेतल्याचा आनंद होत आहे.
राजेंद्र कोतकर
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ अहमदनगर, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण महामंडळ अमरावती, युवा शारीरिक शिक्षक संघटनांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे संच मान्यतेच्या निकषात सरकारने सकारात्मक बदल केले. शारीरिक शिक्षकांबरोबर कला शिक्षकही नोकर भरतीत तब्बल 9 वर्षांनी भरला जाणार असल्याने पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन निकषात शासनाने विशेष शिक्षकाचा दर्जा पुन्हा बहाल करताना, पूर्ण कार्यभारासाठी 6 वी ते 10 वी चा कार्यभार धरून बायफोकल पद्धतीने पदभरती होणार आहे. तसेच प्राथमिकला केंद्र स्तरावर नव्याने शारीरिक शिक्षक पद निर्माण केल्याने प्राथमिकलाही शिक्षक मिळणार आहेत, अशी माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष नंदकुमार शितोळे व उपाध्यक्ष बापू होळकर यांनी दिली.
संच मान्यतेत पद पुन्हा समाविष्ट व्हावे म्हणून गेली सात वर्षे राज्य संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, सचिव विश्वनाथ पाटोळे, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, डॉ. आनंद पवार, राजेश जाधव, राजेश कदम, प्रितम टेकाडे, लक्ष्मण बेल्लाळे, घनःशाम सानप, विलास घोगरे, डॉ. मयुर ठाकरे, डॉ. नितीन चवाळे, महेंद्र हिंगे, अजित वडवकर, बबन गायकवाड, ज्ञानेश्वर रसाळ, सचिन देशमुख, भारत इंगवले, दिनेश म्हाडगूत, अजय आळशी, सचिन पाटील, फिरोज शेख, निवृत्ती काळभोर, अरविंद आचार्य यांनी प्रयत्न केले. 9 वर्षांनी कला-क्रीडा-कार्यानुभव शिक्षकांची भरती होणार असल्याने संघटनेने सरकारचे आभार मानले आहेत.