Ahmednagar News ः अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यांची कमतरता विचारात घेऊन जलसंपदा विभागाने पाणी पुरवठ्यामध्ये 20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पाणी कपातीच्या निर्णयाचा अहमदनगर शहर पाणीपुरवठ्यावर देखील परिणाम होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असून, नागरिकांनी या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पेयजल काटकसरीने वापर करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरिभूमी प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या भित्तीपत्रकाचे (पोस्टर) प्रकाशन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी जलसंकटावर भाष्य केले यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंडे, श्रीकांत पवार, लक्ष्मीकांत साताळकर, आस्थापना विभागप्रमुख व माझी वसुंधरा अभियानाचे प्रमुख मेहेर लहारे, समन्वयक लक्ष्मण लांडगे, हरिभूमी प्रतिष्ठानचे अभय ललवाणी आदी उपस्थित होते.
नागरिकांनी वाहने धुतांना, अंगणामध्ये सडा मारताना होणारा पेयजलाचा अपव्यय टाळावा. नादुरुस्त जलवाहिन्या दुरुस्त करून घ्याव्यात. गळके / टीपकणारे नळ दुरुस्त करून घ्यावेत. पिण्यासाठी पेल्यात आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे. एक-दोन दिवसापूर्वीचे पिण्याचे पाणी टाकून न देता त्याचा इतर वापर करावा. वॉश बेसिनचा नळ गरजेपुरता वापरावा, आदी उपाययोजना करून पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.
उन्हाची तीव्रता वाढली आहे. ग्रामीण भागात पिण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. काही ठिकाणी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. अहमदनगर शहराच्या पाणीपुरवठ्यात 20 टक्क्यांनी कपातीचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यातून जलसंकटाची चाहूल मोठी आहे. त्यामुळए महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी गांभीर्याने घ्यावे, असेही आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी म्हटले.