धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) इथं उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांची आज मंगळवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
राज्याचे ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन रूपनर व बंडगर यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी धनगर समाजाच्या उपाेषणाकडे पाठ फिरवली. याबाबत धनगर समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. विखे पिता-पुत्राविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात 21 सप्टेंबरला यशवंत सेनेच्या प्रतिनिधीसमवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विस्तृत बैठक झाली. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी न्याय असून शासनाने एकमताने या मागणीला पाठिंबा दिला”. आरक्षणाबाबत काही तांत्रिक अडचणी असून काही बाबी न्याय प्रविष्ठ आहेत. त्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत तांत्रिक अडचणींची पन्नास दिवसांमध्ये सोडवणूक करण्यासाठी शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनादरम्यान समाज बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. तसेच आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येईल. धनगर समाजासाठी असलेल्या विविध योजना, सोयी-सवलतींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीला मान देत गेल्या 21 दिवसापासून सुरू असलेले उपोषण सोडले आहे. धनगर समाजाला शाश्वत आरक्षण देण्यासाठी शासन अत्यंत सकारात्मक असून सर्व समाज बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.