रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केलेल्या नगर अर्बन बँकेच्या जिल्ह्यातील ठेवीदारांनी येत्या बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर सकाळी 11 वाजता मोर्चा नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लाल टाकी येथील खाकीदास बाबा मठात झालेल्या जिल्ह्यातील ठेवीदारांच्या पहिल्या बैठकीत बँक बुडवणाऱ्या संचालकांच्या नावाने शिमगा करण्यात आला. या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धारही यावेळी करण्यात आला.
113 वर्षाची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना मागील चार ऑक्टोबर रोजी रिझर्व बँकेने रद्द केला आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार व कामकाज बंद झाले आहे. बँकेच्या पाच लाखा आतील ठेवीदारांना दोन टप्प्यात त्यांचे पैसे मिळाले असले तरी यापैकी राहिलेल्या ठेवीदादांचे तिसऱ्या टप्प्याचे 42 कोटी मिळालेले नाहीत. याशिवाय पाच लाखांवरील 1600 वर ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये बँकेत अडकलेले आहेत. त्यामुळे हे पैसे मिळण्याचे नियोजन करण्यासाठी रविवारी सायंकाळी खाकीदास बाबा मठात ठेवीदारांची बैठक झाली. यावेळी येत्या बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नगर अर्बन बँकेपासून पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बैठकीत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत जिल्हाभरातून अनेकजण आले होते. कोणी मुला-मुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी व अन्य विविध कारणासाठी म्हणून बँकेत विश्वासाने पैसे ठेवले, परंतु बँकेवर विश्वस्त म्हणून आलेल्या संचालकांनी या पैशांची मनमानी लूट केली. त्यामुळे बँक अडचणी आली. चुकीचे कर्ज वाटप केल्याने 800 कोटी बँकेला येणे बाकी आहे. हे पैसे वसूल होणार कधी व ठेवीदारांचे पैसे मिळणार कधी, असे विविध प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. स्वतःवरील आपत्ती सांगताना काही महिला ठेवीदारांच्या डोळ्यात पाणीही आले. बँक बुडण्यास कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांची प्रॉपर्टी जप्त करून व ती विकून ठेवीदारांचे पैसे दिले गेले पाहिजे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
बँकेचे जागरूक सभासद राजेंद्र चोपडा व राजेंद्र गांधी म्हणाले, की फक्त ठेवीदारांनी आम्हाला साथ देण्याचे आवाहन केले. तसेच बँकेचे ठेवीदार डी. एम. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या ठेवीदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा, ऍड. अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, सीए राजेंद्र काळे, आर. डी. मंत्री, एस. झेड. देशमुख, प्रकाश गांधी, महेश देवरे, संजय झिंजे, बहिरनाथ वाकळे, सुरेश क्षिरसागर आधी सह जिल्हाभरातून आलेले ठेविदार उपस्थित होते.
राजेंद्र गांधी म्हणाले की, ठेवीदारांच्या निष्क्रियतेविषयी खंत व्यक्त केली. बँक बचावच्या माध्यमातून मागील चार-पाच वर्षांपासून मी बँकेतील गैर प्रकाराबाबत तक्रारी करीत आहे, सोशल मीडियातून आवाज उठवत आहे, परंतु एकही ठेवीदार माझ्याकडे बँकेत नेमके काय चालले आहे हे विचारण्यासाठी आला नाही. कर्जतचे ठेवीदार महेश देवरे चार दिवस बँकेसमोर उपोषणाला बसले, पण त्यांनाही कोणी भेटले नाही. अशी निष्क्रियता उपयोगाची नाही. त्यामुळे तुम्ही साथ दिली तर तुमचा एकही रुपया बुडणार नाही, असा शब्द दिला. यावेळी त्यांनी बँकेत झालेल्या गैर व्यवहारांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. बँकेत सुमारे 200 कोटी रुपयांचे घोटाळे झाले असून ते दाबण्यासाठीच बँक बंद करण्याचा संचालकांचा उद्देश होता म्हणून ते पुन्हा बँकेत आले, परंतु पोलिसांच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये हे सगळे घोटाळे लवकरच उघड होणार आहेत, असा दावाही त्यांनी केला.
राजेंद्र चोपडा म्हणाले की, बँकेतील गैरप्रकार रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींपासून सर्व संबंधितांशी केलेल्या पत्र व्यवहाराची माहिती दिली व सर्व ठेवीदारांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज असून आता ठेवीदारांनी त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी पेटून उठावे व आम्हाला साथ द्यावी. आम्ही तुमचे पैसे मिळवण्यासाठी सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून, असा विश्वास दिला. येत्या 10 दिवसात किमान 50 ठेवीदारांनी त्यांच्या तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयात कराव्यात, त्यात त्यांनी त्यांची तळमळ व पैसे अडकल्याने झालेली अडचण मांडताना बँकेत झालेल्या गैर व्यवहारात दोषी असलेल्या लोकांवर कारवाईची मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीचे आयोजक कुलकर्णी यांनी भविष्यात करावयाच्या नियोजनाची माहिती दिली. आर.डी. मंत्री यांनी ठेवीदारांनी यापुढे एकत्र राहण्याचे आवाहन केले.
जरांगेंचा आदर्श घ्या
यावेळी बोलताना राजेंद्र चोपडा यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दाखला दिला. तो एकटा माणूस पंधरा दिवस उपोषणाला बसला, तर त्यांनी राज्य हलवून टाकले आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. आपल्यालाही मोर्चे, उपोषण व अन्य आंदोलनात्मक मार्ग स्वीकारायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनास टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
पालकमंत्र्यांना ठेवीदारांचे आवाहन
तब्बल 113 वर्षांची परंपरा असलेली नगर अर्बन बँक बुडली असून ही बँक बुडवण्यास कारणीभूत असलेल्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी समवेत घेऊन फिरू नये, असे आवाहन ठेवीदारांनी यावेळी केले. पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्यासह अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीसमवेत हे दोषी संचालक व त्यांचे समर्थक असल्याने पोलिसांवर त्यांच्यावर कारवाई करण्यास मर्यादा येतात, असा दावाही यावेळी ठेवीदारांनी केला. यासंदर्भात लवकरच पालकमंत्री यांची भेट घेण्याचेही ठरवण्यात आले.