Samajwadi Party News ः मताच्या फायद्यासाठी अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पेटवला गेला. अहमदनगरच्या नामांतराची अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी देखील लोकसभा निवडणुकीत काही उमेदवार स्वतःच्या फायद्यासाठी अहमदनगरएेवजी अहिल्यानगर असे नाव वापरत आहे. या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचा इशारा समाजवादी पक्षाचे प्रदेश सचिव अजीम राजे यांनी दिला.
अजीम राजे म्हणाले, “अहमदनगर शहराला 500 हून अधिक वर्षाचा इतिहास आहे. अहमदनगर शहर ऐतिहासिक शहर असून शहर कोणाची जहागिरी आणि बक्षीस बहाल केलेला शहर नाही. हा अहमद बादशाह याने बसवलेला शहर असून या शहराची एक ओळख आहे. परंतु काही माथेफिरू आपला स्वार्थ जोपासण्यासाठी व राजकीय षडयंत्रातून नामांतराचा मुद्दा पुढे रेटत आहेत. पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर यांना कुठल्याही समाजाचा विरोध नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जेथे आपले पराक्रम गाजविले तेथे नामांतर होण्याची गरज आहे”.
लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार आपल्या प्रचारात बॅनर, पॉम्प्लेट, सोशल मीडिया तसेच अनेक ठिकाणी सभेच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि मतांच्या फायद्यासाठी उमेदवार अहमदनगरऐवजी अहिल्यानगर असे नाव वापरत आहेत. हा प्रकार म्हणजे दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याची भावना आहे. नामांतराचा कुठलाही निर्णय झालेला नसून राजकीय षडयंत्रातून स्वयंघोषित प्रमाणे नामकरण केले गेले आहे. या निवडणुकीत अहमदनगरऐवजी अहिल्यानगर लावणार असाल तर नागरिकांना विचार करावा लागेल. अहमदनगरऐवजी अहिल्यानगर करणाऱ्या उमेदवारांवर कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही अजीम राजे यांनी म्हटले.