Ahmednagar Political ः “पाच वर्षात आम्ही केलेल्या विकास कामांच्या अजेंड्यावर ही लोकसभा निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे आमच्या पुढे समोरच्या उमेदवाराची कामे काहीच नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ देण्याचे नाटक करून त्यांच्याकडून करोडो रुपयांचा निधी मिळवत त्यांना फसवत त्यांची साथ सोडली. उद्या ते जनतेचीही साथ सोडतील यात शंका नाही. नगर जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले एक तरी मोठे काम दाखवावे मगच, एमआयडीसी आणण्याच्या गप्पा माराव्यात. राज्यात अडीच वर्ष शरद पवारांचे रिमोट कंट्रोल असेलेले महाविकास आघाडीचेच सरकार होते. त्यावेळी का नाही एखादी एमआयडीसी करून दाखवली?, असा प्रश्न मी शरद पवारांना करत आहे. याउलट जे जाणता राज्यास जमले नाही, ते मी पालकमंत्री आणि महसूलमंत्री झाल्यावर या जिल्ह्यासाठी केले आहे”, अशी तोफ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांवर डागली. नगर जिल्ह्यातील तीन एमआयडीसींसाठी १७०० एकर जागा विनामूल्य देण्याचा महत्वाचे काम मी केले आहे. उद्योजक कारखानदारांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी सुपा एमआयडीसीमधील त्यांची गुंडगिरी संपवायची आहे. यासाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आणणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री वेखेंनी केले.
महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन नगरमध्ये झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, माजी आमदार चंद्रशेखर घुले, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदी उपस्थित होते.
खासदार सुजय विखे यांनी मागच्या निवडणुकीत मी आणि आमदार संग्राम जगताप एकमेकांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढलो. आज स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळीनी जगतापांचा प्रचार केला होता. आजमात्र सर्व जण माझ्याबरोबर असल्याचा आनंद होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात असलेल्या विखे कुटुंबाने आजपर्यंत एकही व्यक्तीला त्रास न देता रस्त्यावर आणले नाही. जिल्ह्याच्या राजकारणात वैचारिकता जपत सुसंस्कृतपणा आणला. या निवडणुकीत कोण काय बोलतोय, कोण काय करताय याकडे लक्ष देवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकास कामांकडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामांकडे पाहून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येकाने ताकद लावावी. राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही ताकद माझ्या मागे पूर्णपणे उभी राहिल्यास समोरच्या उमेदवाराचे डीपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक गरिबी श्रीमंतीची नसून पुढच्या पिढीच्या भविष्याची आहे. त्यामुळे सर्वांच्या उज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा, असेही खासदार विखे यांनी म्हटले.
आमदार संग्राम जगताप यांनी देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे वारं आहे. त्यामुळे देशाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी प्रवाहाच्या दिशेने जाणेच योग्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप बरोबर जाण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. खा.सुजय विखेंनी प्रत्येक तालुक्याचे प्रश्न समजून घेत ते लोकसभेत मांडून सोडवले आहेत. ते तुमचे हक्काचे व्यक्ती असल्याने त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी सर्वांनी काम करावे, असे सांगितले. चंद्रशेखर घुले, अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे, सुरज चव्हाण सुनील उमाप, विक्रमसिंह कळमकर आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी केले. दत्तात्रय पानसरे यांनी आभार मानले.