Ahmednagar Political : अहमदनगर शहराचे नाव ‘पु्ण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याचा विषय राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला आहे. या नामांतराला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याचवेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या नामांतरात महत्त्वाची भूमिका आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे आणि आमदार दत्ता भरणे यांनी केल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.
राज्य सरकारची आज मंत्रिमंडळाची बैठक होती. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेत निवेदन दिले. या निवेदनात मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतराचा विषय घेण्याची विनंती केली. यानुसार हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी या बैठकीत हा विषय मंजूर केला. विषय मंजूर होताच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. अहमदनगरच्या नामांतराचा विषय बैठकीत तिसऱ्या क्रमाकांवर होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय मंजूर होताच, या विषयासाठी पाठपुरावा करणाऱ्या वरील तिघा आमदारांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे कौतुक केले. ‘राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरण करणारा आहे. त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढए घेऊन जाणारा आहे. लोकप्रिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणार आहे. या निर्णयामुळे अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची महाराष्ट्रातील १३ कोटी नागरिकांची महत्त्वाची इच्छा पूर्ण झाली आहे’, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अहमदनगर शहराचा नामांतराचा विषय मंजूर झाला आहे. जिल्ह्यात नामांतराची मागणी होती, असा तांत्रिक मुद्दा काही उपस्थित केला आहे. नामांतराचा विषय हा केंद्र सरकारच्या अख्यारीत येतो. राज्य सरकारने मंजूर केलेल्या अहमदनगर शहराच्या नामांतराच्या विषयावर केंद्र सरकारकडून पुढची कार्यवाही कधी होणार, अशी चर्चा नगरमध्ये रंगली आहे. तसेच नामांतराच्या मुद्याला नगरमधील वैचारिक संघटनांनी विरोध दर्शवला आहेत. तसेच एमआयएम आणि समाजवादी पक्षाने देखील नामांतराला विरोध केला आहे.